
सध्या महाराष्ट्रात फॉक्सकॉनवरून चांगलंच राजकारण तापलं आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रोज रंगताना दिसत आहेत. याबाबत महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे नेते सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारला प्रकल्प गुजरातला जाण्यासाठी दोषी धरत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघंही महाविकास आघाडीमुळेच प्रकल्प गुजरातला गेल्याचं म्हणत आहेत. याच संदर्भात उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
फॉक्सकॉन हा प्रकल्प दोन महिन्यात गुजरातला गेलाच कसा? गुजरात राज्य महाराष्ट्राचा लहान भाऊ आहे. त्यांच्याकडे हा प्रकल्प गेला पण त्यावेळी राज्य सरकार काय करत होतं? वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने राज्याचं मोठं नुकसान झालं आहे. आम्ही हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले होते. आत्ताचे सत्ताधारी प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याबद्दल आम्हाला दोष देत आहेत. मात्र त्यांनी आत्मपरीक्षण करायची गरज आहे. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी याबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेच्या मुंबईतल्या विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांची बैठक मुंबईत पार पडली. यामध्ये दसरा मेळाव्यासंदर्भातही उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडून दसरा मेळावा हायजॅक होण्याची शक्यता आहे. अशात दसरा मेळाव्यासाठी तयारीला लागा असे आदेश उद्धव ठाकरेंनी आजच्या बैठकीत दिले आहेत.
फॉक्सकॉन प्रकल्पावरून राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केले होते. मात्र शिंदे-फडणवीस सरकारने म्हणावे तसे प्रयत्न केले नाहीत असा आरोप आदित्य ठाकरे यांनीही केला आहे. तसंच आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या शिवसंवाद यात्रेतही याबाबतचा उल्लेख करून प्रोजेक्ट महाराष्ट्राबाहेर गेला हे उद्योग मंत्री उदय सामंत यांना माहितही नव्हतं असंही म्हटलं आहे. तसंच शरद पवार, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण या सगळ्यांनीच फॉक्सकॉन गुजरातला गेल्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. मात्र अद्यापपर्यंत उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया समोर आली नव्हती. ती आज समोर आली आहे.
वेदांता फॉक्सकॉनच्या संदर्भात विषय गाजतोय. अनिल अग्रवाल यांनी सगळं ट्विट करून सांगितलं. पण ३ पत्रकार आहेत जे त्यांच्या संस्थेसाठी नाही तर राजकीय स्वार्थासाठी काम करतात. ज्या दिवशी मी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यादिवशी मी CEO एमआयडीसीला बोलावलं आहे. त्यानंतर वेदांताची चौकशी केली. मला त्यांनी सांगितलं की गुजरातकडे वेदांताचा कल आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. आम्ही दोघांनी त्यांच्याशी चर्चा केली. मात्र तोपर्यंत गुजरातकडे आम्ही गेलो आहोत. असं सांगितलं त्यामुळे महाविकास आघाडीमुळेच हा प्रकल्प गुजरातला गेला असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं.