Jal Jeevan Mission Contractors' Protest : राज्यात 'हर घर नल, हर घर जल' असा संदेश देत राबवण्यात आलेली केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी 'जल जीवन मिशन' योजना सध्या कंत्राटदारांसाठी 'मरण योजना' ठरताना दिसत आहे. गावागावात पाणीपुरवठ्याची कामे यशस्वीरीत्या पूर्ण करूनही गेल्या दोन वर्षांपासून कामाचा मोबदला मिळालेला नसल्याने राज्यभरातील शेकडो कंत्राटदार पुन्हा एकदा मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनासाठी उतरले आहेत. काळे कपडे परिधान करून अत्यंत उन्हात आणि हवालदिल अवस्थेत आपल्या हक्काच्या पैशांसाठी आंदोलन करणाऱ्या या कंत्राटदारांच्या डोळ्यातून अश्रू अनावर होत असून, प्रशासनाच्या निर्दयी कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
ADVERTISEMENT
10 ते 15 हजार कोटींची बिलं थकीत
महाराष्ट्रभरातून आलेल्या कंत्राटदारांनी केलेल्या दाव्यानुसार, जल जीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या कामांची तब्बल 10 ते 15 हजार कोटी रुपयांची बिलं सरकारकडे अद्याप थकीत आहेत. पाणीपुरवठ्याची 90 ते 95 टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण झाली असून, अनेक ठिकाणी गावांना पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मात्र, शासनाकडून देयके अदा (Payment Release) करण्याची प्रक्रिया रडतखडत सुरू आहे. बँक खाती NPA (Non-Performing Asset) होणे, एनबी (Non-Banking/Default) मध्ये जाणे, बँकांकडून जप्तीच्या नोटीसा येणे आणि सावकारी कर्जाचा डोंगर साचल्याने राज्यभरातील कंत्राटदार पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत.
हे ही वाचा : पुणे : राहुल गांधींच्या 'छात्रों की गुंज'मधल्या कॅमेरापलिकडच्या गोष्टी
'घरातील सोनं, फ्लॅट आणि शेती विकली'; हवालदिल कंत्राटदारांची आपबिती
आझाद मैदानावर जमा झालेल्या कंत्राटदारांनी आपल्या व्यथा मांडताना प्रशासकीय दिरंगाईचे विदारक चित्र समोर आणले. कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांनी वैयक्तिक कर्जे काढली, सावकारांकडून अवाजवी व्याजाने पैसे घेतले, कुटुंबातील महिलांचे दागिने व मंगळसूत्र गहाण ठेवले, तर अनेकांना आपल्या जमिनी आणि राहते फ्लॅट विकण्याची वेळ आली आहे.
हे ही वाचा : घरगुती वाद की आणखी काही? तिघांच्या मृत्यूचं कारण काय? दोन्ही कुटुंबियांचे वेगवेगळे दावे
नागपूरचे कंत्राटदार सोवित रंगारी यांनी साडेपाच कोटींच्या मालमत्तेची हानी झाल्याचे सांगत, दरमहा लाखो रुपयांचे व्याज भरून थकल्याने त्यांच्या घरावर जप्ती आल्याची व्यथा मांडली. वेळेवर सहकाऱ्यांनी अडवले नसते तर सातव्या मजल्यावरून उडी मारून मुलाबाळांसह आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि यवतमाळच्या कंत्राटदारांनी महिन्याला १० ते १५ लाख रुपयांचे व्याज भरून मूळ मुद्दल जशीच्या तशीच असल्याचे सांगितले. व्याजाचा डोंगर आणि बँकांच्या लिलावाच्या नोटीसांमुळे समाजात तोंड दाखवणे कठीण झाले आहे.
हे ही वाचा : चंद्रपूर : कोर्टाबाहेर भरदिवसा फायरिंग, डोक्यात गोळ्या झाडून तरुणाची हत्या; कारण काय?
पुढची भूमिका: 'आता सहन होत नाही, सामूहिक आत्महत्येची वेळ'
नागपूर, कोल्हापूर, सातारा, यवतमाळ अशा विविध जिल्ह्यांतून आलेल्या कंत्राटदारांचे म्हणणे आहे की, त्यांच्यावर अवलंबून असलेले मजूर, जेसीबी चालक, पाईपलाईन जोडणारे आणि किराणा दुकानदार दररोज पैशांसाठी तगादा लावत आहेत. नागपूरवरून मुंबईत येण्यासाठीही कडेवरचे पैसे उरलेले नाहीत. शासनाने जर येत्या काही दिवसांत १५ दिवसांच्या आत थकीत देयके अदा केली नाहीत, तर राज्यभरातील कंत्राटदार संघटना सरकारला अधिकृत निवेदन देऊन सामूहिक आत्महत्येची तारीख आणि वेळ मागतील, असा थेट इशारा कंत्राटदारांनी दिला आहे.
ADVERTISEMENT












