मुंबईकरांची दाणादाण, 'या' भागांमध्ये गुडघाभर पाणी, अंधेरीतील सबवे बंद, धडकी भरवणारा पाऊस
Mumbai Rain Update : मुंबईत गेली चार दिवसांपासून पावसाने नको केलं आहे. यामुळे मुंबईकरांना नाहक त्रास निर्माण झाला आहे. मुंबईतील रस्त्यांना नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

बातम्या हायलाइट

मुंबईत चार दिवसांपासून पावसाचा हाहाकार

मुंबईकरांची दाणादाण

मुंबईतील पावसाची महत्त्वाची अपडेट
Mumbai Rain Update : मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. पावसाचा आज चौथा दिवस असून मुंबई आणि उपनगरांतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. अशातच आता मुंबईसह पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गातही पावसाने धुमाकूळ घातल्याचे चित्र आता समोर आलं आहे. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच या पावसामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे रस्ते वाहतुकीप्रमाणे रेल्वे वाहतुकीवरही चांगलाच परिणाम दिसून येतोय.
हे ही वाचा : Mumbai Weather: मुंबईत धो-धो पाऊस पडणार, घरातून बाहेर पडण्याआधी हवामान खात्याचा अलर्ट तर पाहा!
सखल भागात गुडघाभर पाणी
मुंबईत चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबईमध्ये सखल भागात गुडघाभर पाणी साचलेलं दिसून येतंय. यामुळे महापालिकेनं पावसाची स्थिती जाणून घेत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून हवामान विभागाने मुंबईला पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. सखल भागांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीचा मोठा खोळंबा निर्माण झाला आहे. तसेच मध्य रेल्वे वाहतुक सेवा अगदी संत गतीने सुरू आहे. 20 मिनिटे उशीरा रेल्वे सेवा सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.
अंधेरी सबवे बंद
मुंबईतील वडाळा येथील चारकोप रस्ता, दादरमधील हिंदमाता परिसरासह अंधेरी सबवे पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. इतर काही भागांत रस्त्यांना दीड फुटापर्यत पाणी साचलं आहे. तसेच पालघरमध्येही मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. दहिसरच्या पूर्व पश्चिम एक्सप्रेस महामार्गावरील टोलनाक्याजवळही रस्ते वाहतूक ठप्प झाले आहेत.
हे ही वाचा : Maharashtra Weather: राज्यभरात पावसाचा हाहाकार, कोकणात वरूणराजाचं रौद्र रुप.. नागरिकांनो काळजी घ्या!
पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवर एकही वाहन दिसत नाही. कधीही न झोपणारी मुंबई आज पावसामुळे पूर्णपणे ठप्प पडली आहे. याचा मुंबईकरांवर मोठा परिणाम निर्माण झाला आहे. तसेच काही खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितलं आहे.