Lok Sabha Election BJP : 'अबकी बार 400 पार' भाजपवरचं झालं बुमरँग!
Bjp Lok Sabha election : आता प्रश्न आहे तो 'चार सो पार'चा बुमरँग झालंय का? तर हो. कारण हे खुद्द महायुतीचे नेतेच सांगत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

'अबकी बार चार सो पार'वरून भाजप खिंडीत

लोकसभा निवडणूक २०२४

भाजपच्या घोषणेने विरोधकांच्या हाती आयते कोलीत
Lok Sabha Election 2024 : 'अब की बार चारसो पार, तिसरी बार मोदी सरकार'! लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच भाजपनं ही घोषणा करून वातावरण तयार केलं. दिल्लीपासून गल्लीपर्यंत हे घोषवाक्य घुमलं. इतकंच काय तर सुरुवातीच्या प्रचारसभांमध्य़े पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यासह एनडीएच्या नेत्यांनी 'अब की बार 400 पार'वर जोर दिला. विरोधकांच्या आत्मविश्वासाला तडा देऊ पाहणाऱ्या या घोषणेचा जोर मात्र, पहिल्या टप्प्यानंतरच कमी होत गेला. आता क्वचितच ही घोषणा कानावर पडतेय... नेमकं असं काय झालंय की भाजपकडून ही घोषणा देणं टाळलं जातंय, अशी चर्चा जोरात सुरू झालीये. 'अब की बार चारसो पार'ची घोषणा भाजपवर बुमरँग झालीये का आणि त्यामागची कारणं काय, हेच समजून घेऊयात...
2014 आणि 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत मिळालं. सलग दहा वर्ष सरकारमध्ये राहिल्यानंतर भाजपनं आता तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी झोकून दिलं आहे. 2019 पासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी करत असलेल्या भाजपनं नेहमी प्रमाणे यावेळी एक घोषणा दिली, ती म्हणजे 'अबकी बार चारसो पार, फिर एक बार मोदी सरकार'!
हेही वाचा >> अजित पवारांना धक्के, फडणवीसांनी विधानसभेसाठी टाकला डाव?
भाजपच्या या घोषणेनं देशातील वातावरण ढवळून निघालं. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर 'चार सो पार'चा नारा सगळीकडं घुमू लागला. पण, हळूहळू याच 'चारशे पार'मुळे भाजपची अडचण झाल्याचं दिसू लागलं. कारण याच घोषणेवर बोट ठेवत विरोधकांनी भाजपला घेरलं, तेही संविधान बदलाच्या मुद्द्यावरून. विरोधकांनी हा मुद्दा उचलला आणि तो गावखेड्यापर्यंत पोहोचवला.
भाजपला चारशे जागा संविधान बदलण्यासाठी हव्या आहेत, हा मुद्दा लोकांवर बिंबवण्यात विरोधक यशस्वी होत असल्याचं दिसून आलं. कारण प्रचारात भाजपला सातत्यानं यावर खुलासे करावं लागत आहेत.