Raj Thackeray : ‘हे नितीन गडकरींचं अपयश, महाराष्ट्राचं दुर्दैव’, राज ठाकरे का भडकले?
महाराष्ट्रातील महामार्गाची अवस्था वाईट असल्याचा मुद्दा उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नितीन गडकरी यांच्या खात्यावर ताशेरे ओढले.
ADVERTISEMENT

Raj Thackeray on Nitin Gadkari : टोल नाका तोडफोडीवरून भाजप आणि मनसेत चांगलाच कलगीतुरा रंगलाय. आज याच मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपवर चांगलाच हल्ला चढवला. इतकंच नाही, तर राज ठाकरेंनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित केले.
राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत. माध्यमांशी त्यांनी काही मुद्द्यांवर संवाद साधला. यावेळी त्यांना टोल नाका तोडफोड प्रकरणाबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. राज ठाकरेंनी याला उत्तर दिलं. ते म्हणाले, “जसं मुंबई-पुणे महामार्गावर दोन्ही बाजूंनी संरक्षण कडे लावण्यात आले. तसे समृद्धी महामार्गावर कुठेही केलेलं नाही. त्याच्यामुळे आतापर्यंत अपघातात जवळपास 400 लोक मृत्यूमुखी पडलेत. याची जबाबदारी भाजप किंवा सरकार घेणार का? जाळे न लावता महामार्ग सुरू केला आणि जनावरं रस्त्यावर येताहेत. लोक वेगाने गाड्या घेऊन जातात आणि अपघातात मरतात. काही खबरदाऱ्या घेणं, ही सरकारची जबाबदारी नाहीये का? पण, तुम्ही आधी टोल बसवताहेत. लोकांच्या जगण्या मरण्याची काही काळजी नाही. पण, टोल पाहिजे.”
मुंबई-गोवा महामार्ग, राज ठाकरेंचा रोकडा सवाल
“रस्त्यांची परिस्थिती बघा किती घाणेरडी आहे. लोकांना टोलवर सहा-सहा तास लागताहेत. आमचे एक मित्र नाशिकवरून येत होते. त्यांना सात तास लागले. खड्डे पडलेत. वाहतूक कोंडी होतेय. तुम्ही कसला टोल वसूल करता आहात? यावर भाजप काही बोलणार आहे का? 17 वर्षांपासून मुंबई-गोवा रस्ता सुरू आहे. 17 वर्षे लागतात का?”, असा रोकडा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
वाचा >> ‘एनडीए अमिबा, मोदींची जेवणावळ’; INDIA च्या स्थापनेनंतर उद्धव ठाकरेंचा पहिला हल्ला
राज ठाकरे गडकरींबद्दल काय बोलले?
“एका ठिकाणी रस्ता बनवायचा, दुसऱ्या ठिकाणी बनवायचा नाही. बनवलेला रस्ता खराब होतो. हे किती काळ चालणार? मला कळत नाही की, देशातील रस्ते बांधणी करणारा केंद्रातील मंत्री मराठी आहे. महाराष्ट्रातील आहे आणि महाराष्ट्रातीलच रस्ते खराब आहेत. याच्यासारखं दुर्दैव नाही”, असं म्हणत राज ठाकरेंनी नितीन गडकरींच्या खात्याबद्दल संताप व्यक्त केला.