'कोण कोणाशी युती करतो, याची चिंता नको त्याचा हिशोब आमच्याकडे..', शिंदेंचं थेट राज ठाकरेंनाही आव्हान?
मनसे आणि शिवसेना UBT यांच्यातील युतीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. पाहा दसरा मेळाव्यात ते नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

मुंबई: शिवसेनेच्या (शिंदे गट) दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने उद्धव ठाकरेंवर टीका केली. मात्र, त्याचवेळी त्यांनी एक असं विधान केलं की, ज्यामुळे आता त्यांच्या निशाण्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे असल्याचंही सूचित होत आहे. 'कोण कोणाशी युती करतो, कोण कोणाशी मनोमिलन करतो याची चिंता तुम्ही करू नका.. त्याचा हिशोब आमच्याकडे आहे.' असं मोठं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी भाषणादरम्यान केलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही ठाकरे बंधूसाठी राजकीय अस्तित्वाची लढाई निर्माण झाली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी हिंदी भाषा सक्तीला विरोध करण्यासाठी मनसे आण शिवसेना (UBT) म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले होते. तेव्हापासूनच आगामी महापालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंची युती होईल असं सातत्याने म्हटलं जात आहे.
हे ही वाचा>> 'तुम्ही एक तरी बिस्किटचा पुडा तरी घेऊन गेलात का?', दसरा मेळाव्यात शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल
दरम्यान, याच मुद्द्यावरून आता पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंनी थेट इशाराच ठाकरे बंधूंना दिला आहे. 'आमच्याकडे हिशोब आहे' असं म्हणत एकनाथ शिंदेंनी एक प्रकारे उद्धव ठाकरेंसह राज ठाकरेंना देखील आव्हान दिल्याचं बोललं जात आहे.
ठाकरेंच्या युतीच्या चर्चेवर पाहा एकनाथ शिंदे काय म्हणाले
'आता लोकसभा आपण जिंकली, विधानसभा जिंकली आणि आता स्थानिक स्वराज संस्था देखील महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही. दिल्लीपासून गल्लीपर्यंत महायुती. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये देखील महायुतीची सत्ता आणणं आवश्यक आहे नाहीतर मुंबई जी पुढे जात आहे ती 25 वर्ष मागे जाईल. मुंबईची अधोगती होईल. मुंबईकर सुज्ञ आहे, तो विकासाला प्राधान्य देणारा आहे.'
'अडीच-तीन वर्षात मुंबईसाठी जे काम केलं हे फक्त लोकांपर्यंत पोहचविण्याचं काम तुम्हाला करायचंय. जिल्हा परिषद भगवा फडकवणे, नगरपरिषद भगवा फडकवणे, महापालिका भगवा फडकवणे. महायुतीचा भगवाच फडकला पाहिजे. म्हणून आपण महायुती म्हणूनच निवडणुका लढवणार आहोत.'