Gajanan Kirtikar : ‘शरद पवारांच्या गाडीत…’, कीर्तिकरांनी सांगितला कदमांच्या गद्दारीचा इतिहास
Gajanan Kirtikar Ramdas Kadam Latest News : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील दोन नेते म्हणजे रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांच्यात जोरदार राजकीय वाद सुरू आहे. रामदास कदमांनी टीका केल्यानंतर गजानन कीर्तिकर यांनी थेट इशाराच दिला आहे.
ADVERTISEMENT

Gajanan Kirtikar Ramdas Kadam News : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून शिंदेंच्या शिवसेनेतील दोन नेते एकमेकांवर आगपाखड करताहेत. रामदास कदम यांनी केलेल्या विधानानं दोन्ही नेत्यांत राजकीय कुस्ती सुरू झाली. खासदार गजानन कीर्तिकरांनी दिलेल्या उत्तरानंतर कदम संतापले आणि त्यांनी ‘गजाभाऊ, निवडणुकीला जरूर उभे रहा. फक्त फॉर्म भरून घरात बसू नका. पक्षाची बेईमानी होणार नाही, पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू नका”, अशा शब्दात पलटवार केला. त्यामुळे कीर्तिकरांच्या संयमाचा कडेलोट झाल्याचं दिसलं. संतापलेल्या कीर्तिकरांनी थेट कदमांच्या गद्दारीचाच इतिहास सगळ्यांना सांगितला. (Gajanan Kirtikar Reply to Ramdas Kadam)
झालं असं की मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावर रामदास कदमांची नजर आहे. त्यांनी तसं बोलूनही दाखवलं. गजानन कीर्तिकरांचं वय झालंय. ते लढणार नसतील, तर सिद्धेश कदम या मतदारसंघातून लढतील, असं म्हणत कदमांनी मतदारसंघावर दावा केला. त्यावर एकाच घरात दोन मुलांना तिकीट कसं देता येईल, असा प्रश्न कीर्तिकरांनी केला.
रामदास कदमांनी डिवचलं, गजानन कीर्तिकरांना नेमकं काय बोलले?
त्यानंतर कदमांनी कीर्तिकरांना थेट हल्ला केला. “गजाभाऊ तुम्ही निवडणुकीला उभे रहा. तुमचा मुलगाही तुमच्या मतदारसंघात उभा राहणार आहे. फक्त फॉर्म भरून घरात बसू नका. पक्षाची बेईमानी होणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला विरोध करण्याचं कारण नाही. एकाच ऑफिसमध्ये बाप आणि बेटा बसतात. एकाच ऑफिसमध्ये बसून दोघे काय करतात हे सगळी दुनिया बघतेय. मुलाला तिकडून उभं करायचं आणि तुम्ही फक्त फॉर्म भरायचा. मुलाला बिनविरोध निवडून आणायचं असा प्रकार होणार नाही, याची काळजी घ्या. पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू नका, एवढीच हातजोडून विनंती आहे”, असं कदम म्हणाले.
कीर्तिकर म्हणाले, “कदमांच्या गद्दारीचा इतिहास फार मोठा”
रामदास कदमांनी टीका केल्यानंतर कीर्तिकरांनी त्यांच्या गद्दारीचा शिक्का मारला. ते म्हणाले, “रामदास कदम यांचा गद्दारीचा इतिहास फार मोठा आहे. 1990 साली मी जेव्हा मालाड विधानसभेतून निवडणुकीसाठी उभा होतो, त्याचवेळेला रामदास कदम खेडमधून निवडणूक लढवत होते. माझ्या मालाड विधानसभा क्षेत्रातील कांदिवलीमधील सर्व कार्यकर्ते त्यांनी खेडला नेले होते व मला पाडण्यासाठी अथक प्रयत्न केले, पण ते यशस्वी झाले नाहीत. मी १० हजार मताधिक्याने विजयी झालो.”