सलग दोन दिवस फडणवीस झाले नाराज, 'ते दोन' निर्णय अन् मुख्यमंत्री निराश!
नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयानंतर आता कोर्टाने मतमोजणी देखील पुढे ढकलली आहे. याचबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे. पाहा ते नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

मुंबई: राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या मतदानाच्या 48 तास आधी निवडणूक आयोगाने 20 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायती तसेच 154 सदस्यांच्या निवडणुका या पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज (2 डिसेंबर) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ऐन मतदान सुरू असताना एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. उर्वरित नगर परिषदांचे मतदान जोवर पार पडत नाही तोवर आज होणाऱ्या मतदानाची मतमोजणी ही करू नये. म्हणजे जी मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार होती ती आता थेट 21 डिसेंबर रोजी होणार आहे. पण याच सगळ्याबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री सलग दोन दिवस आपली नाराजी व्यक्त केली आहे. काल (1 डिसेंबर) निवडणूक पुढे ढकलण्याच्या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर आज कोर्टाने दिलेल्या निकालावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कोर्टाने मतमोजणी पुढे ढकलली, पाहा फडणवीस का झाले नाराज
'मी अद्याप निकाल वाचलेला नाही. पण हा निकाल जर खंडपीठाने दिला असेल तर तो सर्वांना मान्यच करावा लागेल. पण आता जवळपास 25-30 वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतोय. पण असं पहिल्यांदा घडतंय की, घोषित केलेल्या निवडणुका पुढे चालल्या आहेत, त्याचे निकाल पुढे चालले आहेत. मला असं वाटतं की, एकूणच ही जी काही पद्धत आहे ती फार काही योग्य वाटत नाही.'
हे ही वाचा>> मोठी बातमी: नगर परिषद, नगर पंचायतींची मतमोजणी उद्या नाही, तर... हायकोर्टाचा सर्वात मोठा निर्णय!
'खंडपीठ स्वायत्त आहे. त्यांनी दिलेला निकाल सर्वांना मान्य करावा लागेल. निवडणूक आयोगही स्वायत्त आहे. पण यातून जे उमेदवार आहे जे मेहनत करतात.. इतके दिवस प्रचार करतात त्या सगळ्यांचा एक प्रकारे भ्रमनिरास होतो.'










