पवनराजे निंबाळकर हत्याकांड, आरोपींनी आधीच भोगला आहे 'इतका' तुरुंगवास, आज काय होणार?
पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल आज लागणार आहे. मात्र यामधील आरोपींनी काही काळ जेल भोगली आहे. त्यामुळे आज न्यायालयात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पवनराजे निंबाळकर हत्याकांड
आरोपींनी आधीच भोगला आहे 'इतका' तुरुंगवास
आज काय होणार?
Pawanraje Nimbalkar Murder, गणेश जाधव : पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचा चालक समद काझी दुहेरी हत्याकांड प्रकरणाची अंतिम सुनावणी आज, 20 जून रोजी होणार आहे. मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी मुख्य आरोपी आणि राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तब्बल 20 वर्षांनंतर या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल येत असल्याने धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष याकडे लागले आहे. आज सुरुवातीला कोर्ट आरोपींच्या दोषसिद्धीबाबत निर्णय देऊन ते दोषी आहेत की निर्दोष हे जाहीर करू शकते. आरोपी दोषी आढळल्यास, शिक्षेच्या प्रमाणावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्ट आपला अंतिम निर्णय जाहीर करेल.
कोणी किती काळ शिक्षा भोगली?
या खटल्याच्या दीर्घ प्रवासात मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील हे सर्वात कमी काळ, म्हणजेच 3 महिने 19 दिवस पोलीस व न्यायालयीन कोठडीत राहिले. 6 जून 2009 रोजी अटक झाल्यानंतर अवघ्या साडेतीन महिन्यांत, 25 सप्टेंबर 2009 रोजी अलिबाग कोर्टाने त्यांना 2 लाख रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. या उलट, गुन्ह्यातील शूटर दिनेश तिवारी हा सर्वाधिक काळ न्यायालयीन कोठडीत राहिला. 25 मे 2009 रोजी अटक झाल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत न्यायाधीश महाले यांच्या कोर्टात कलम 164 अंतर्गत जबाब नोंदवला होता. तिवारीने तब्बल 15 वर्षे 11 महिने तुरुंगात काढले, तर दुसरा शूटर महात्मा उर्फ पिंटू सिंग चौधरी हा 15 वर्षे 10 महिने तुरुंगात होता. सुनावणी दीर्घकाळ चालल्यामुळे हे दोन्ही शूटर एप्रिल 2025 मध्ये जामिनावर सुटले, तर माफीचा साक्षीदार बनलेला पारसमल जैन 14 वर्षे 6 महिन्यांनंतर बाहेर आला.
हे ही वाचा : पुणे : किल्ल्यावर पोज द्यायला गेला अन् भयंकर घडलं, तरुण बिझनेसमन जीवानिशी गेला
न्यायालयीन प्रक्रिया काय?
न्यायालयीन प्रक्रियेनुसार, दोषी ठरविणे आणि शिक्षा निश्चित करणे या दोन स्वतंत्र प्रक्रिया आहेत. कोर्टाने आरोपींना दोषी ठरवल्यास, त्यांना किती शिक्षा द्यायची यावर सरकारी पक्ष आणि आरोपींचे वकील यांच्यात युक्तिवाद होतो. शिक्षेची कायदेशीर तरतूद, आरोपींचे वय, आरोग्य आणि त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी या सर्व बाबींचा विचार करून कोर्ट शिक्षा सुनावते. ही संपूर्ण प्रक्रिया एकाच तारखेला पूर्ण करणे किंवा दोषी ठरवून शिक्षेवरील युक्तिवादासाठी पुढील तारीख देणे, हा पूर्णपणे कोर्टाचा अधिकार असतो. दोषी आरोपींना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी आणि अपीलासाठी न्यायालयाकडून निकालाची प्रत विनामूल्य दिली जाते.
हे ही वाचा : पुणे हादरलं, ओढणीने गळा आवळून विवाहितेचा खून; नेमकं काय घडलं?
आज काय होणार?
कायद्यानुसार, जर आरोपी दोषी ठरून त्याला शिक्षा झाली, तर त्याचा न्यायालयीन कोठडीत (MCR) किंवा अंडरट्रायल म्हणून तुरुंगात घालवलेला काळ शिक्षेमध्ये समायोजित (Set-off) केला जातो. मात्र, जन्मठेपेच्या शिक्षेच्या (Life Imprisonment) बाबतीत या 'सेट-ऑफ'चा परिणाम मर्यादित असतो; कारण जन्मठेप म्हणजे दोषी व्यक्तीच्या नैसर्गिक आयुष्याचा उर्वरित संपूर्ण काळ मानला जातो, त्यामुळे यात केवळ सरळ वजाबाकी होत नाही. दुसरीकडे, या गुन्ह्यात माफीचा साक्षीदार बनलेल्या आरोपीने जर कोर्टासमोर सर्व सत्य बाबी उघड केल्या असतील आणि आपली साक्ष कायम ठेवली असेल, तर कायद्यानुसार त्याला शिक्षा होत नाही. त्यामुळे आज न्यायालय या सर्वांबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.









