'पामतेल पण होतं, आता माझं टक्कल...' नाव सांगत धसांनी घोटाळे बाहेर काढले
विधानसभेत भाजप आमदार सुरेश धस यांनी विविध घोटाळ्यांच्या मुद्द्यावर सरकार आणि संबंधित यंत्रणांवर जोरदार हल्लाबोल केला. भाषणादरम्यान त्यांनी अनेकांची नावं घेत विविध प्रकरणांचा उल्लेख करत सभागृहात आक्रमक भूमिका मांडली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'पामतेल पण होतं, आता माझं टक्कल'
नाव सांगत धसांनी घोटाळे बाहेर काढले
Suresh Dhas in Vidhansabha : आमदार सुरेश धस यांनी पावसाळी अधिवेशनात विधानसभेत जोरदार आणि अभ्यासपूर्ण भाषण केले. आपल्या भाषणाची सुरुवात करताना त्यांनी तिरुमला एडिबल ऑईल आणि हेअर ऑईल ब्रँडचा उल्लेख करत, मुख्यमंत्र्यांचे आणि संबंधित विभागाचे नवीन विधेयकातील चांगल्या तरतुदींबद्दल अभिनंदन केले. या विधेयकात गुप्त चलन (क्रिप्टोकरन्सी), डिजिटल नाणी आणि सहकारी पतसंस्थांमधील ठेवी सुरक्षित ठेवण्यासाठी केलेल्या कडक नियमांचे त्यांनी स्वागत केले. विशेषतः, दायित्वाच्या एकूण रकमेच्या 50 टक्के रक्कम सक्षम प्राधिकाऱ्याकडे जमा केल्याशिवाय फसवणूक करणाऱ्यांना कोणतेही अपील दाखल करता येणार नाही, या तरतुदीचे त्यांनी कौतुक केले.
संचालक मंडळ फरार
धस यांनी सभागृहाचे लक्ष वेधताना सांगितले की, मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह संस्थांचे रजिस्ट्रेशन केंद्र सरकार करत असल्यामुळे पूर्वी राज्य सरकारच्या सहकार आयुक्तांच्या एनओसीची गरज नव्हती, ज्यामुळे अशा संस्थांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले होते. याचाच गैरफायदा घेत अनेक संस्थांनी 18 ते 26 टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचे प्रलोभन दाखवून गोरगरीब जनतेचा विश्वासघात केला.'
यापुढं ते म्हणाले की, 'लोकांचा कष्टाचा पैसा, रेल्वे व तलावाच्या भूसंपादनातून मिळालेली नुकसानभरपाई आणि राष्ट्रीय महामार्गाचे मिळालेले पैसे जनतेने या पतसंस्थांमध्ये ठेवले होते. मात्र, या संस्थांनी हा पैसा स्वतःच्या इस्टेट आणि उद्योग वाढवण्यासाठी जसे की प्लॉटिंग आणि इतर व्यवसायांमध्ये वळवला. संस्था बंद पडताच संचालक मंडळ फरार होऊन दुबईसारख्या ठिकाणी जाऊन राहतात आणि त्यांचे देशातील व्यवसाय सुरूच राहतात, तर दुसरीकडे स्थानिक ऑफिस आणि बँका बंद झाल्यामुळे सामान्य ठेवीदार रस्त्यावर येतो.'
हे ही वाचा : "रिअॅलिटी त्यांनाही माहितीये अन् मलाही..", शिंदेंच्या मुख्यमंत्री बनण्याच्या महत्त्वाकांक्षेवर फडणवीस स्पष्टच बोलले
गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त
बीड जिल्ह्यातील भीषण परिस्थिती मांडताना सुरेश धस यांनी थेट काही संस्थांची नावेच जाहीर केली. यामध्ये प्रामुख्याने 'ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक' असून, यात साडेसहा लाख ठेवीदारांचे तब्बल 2600 कोटी रुपये बुडाले आहेत. याशिवाय जिजाऊ मल्टीस्टेटचे 200 कोटी, छत्रपती शाहू अर्बनचे साडेतीनशे कोटी, राजस्थानी मल्टीस्टेटचे 500 कोटी, साईराम मल्टीस्टेटचे 400 कोटी आणि मातोश्री मल्टीस्टेटचे 400 ते 500 कोटी रुपये अडकल्याचे त्यांनी सांगितले.









