'1 कोटी खोटारडे मेल्यानंतरच हे पैदा झाले असतील'; मिसिंग लिंकवरून विधानसभेत CM फडणवीसांचा संताप
'काही लोकं तर असे आहेत की, एखाद कोटी खोटारडे लोकं मेल्यानंतर ते पैदा झाले असतील.' असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आपला संताप व्यक्त केला. जाणून घ्या नेमकं काय घडलं.
ADVERTISEMENT

मुंबई: दोन दिवसांपूर्वी मुंबई-पुणे मिसिंग लिंक (कनेक्टिंग लिंक) परिसरात दरड कोसळल्यामुळे अनेक तास वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेनंतर विरोधकांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र, आज (8 जुलै) विधानसभेत राज्यातील पावसाची परिस्थिती आणि मिसिंग लिंकबाबत निवेदन करताना मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले.
विधानसभेत मुख्यमंत्र्यांचा संताप...
'काही लोकं तर असे आहेत की, एखाद कोटी खोटारडे लोकं मेल्यानंतर ते पैदा झाले असतील आणि त्यांना खोटं बोलायलाही लाज वाटत नाही. कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी टीव्हीवर येऊन खोटं बोलतात. एखाद कोटी.. जयंतराव तुम्ही हसू नका.. मी तुम्हाला नक्की सांगतो, आपल्याकडे काही हे नाहीए.. पण कोटी खोटारडे मेल्याशिवाय हे पैदाच नाही होऊ शकत.'
अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
'खोटारडेपणा पूर्णपणे उघड झाला'
फडणवीस म्हणाले की, मिसिंग लिंकच्या घटनेनंतर वास्तव समोर आले असून विरोधकांचा खोटारडेपणा उघड झाला आहे. "महायुती सरकारमध्ये हिंमत होती म्हणून आम्ही हा प्रकल्प पूर्ण करून दाखवला," असे ते म्हणाले.
कोकण रेल्वेचे उदाहरण देत विरोधकांना सुनावले
मिसिंग लिंक प्रकल्पाचे समर्थन करताना मुख्यमंत्र्यांनी कोकण रेल्वेचा संदर्भ दिला. 'कोकण रेल्वे उभारतानाही दरड कोसळण्याचे कारण पुढे करून विरोध झाला होता. मात्र, तत्कालीन रेल्वे मंत्री मधु दंडवते यांनी धाडस दाखवत हा प्रकल्प पूर्ण केला. सुरुवातीच्या काही वर्षांत दरडी कोसळल्या, पण प्रत्येक वेळी त्यातून धडा घेत सुधारणा करण्यात आल्या आणि अखेर समस्या मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आली', असे त्यांनी सांगितले.










