'पश्चाताप होतोय, तेव्हाच अनंत तरेंचं ऐकलं असतं तर शाहांच्या चरणी लोटांगण घेणारे...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Uddhav Thackeray on Anant Tare : 'तेव्हाच अनंत तरेंचं ऐकलं असतं तर अमित शाहांच्या चरणी लोटांगण घेणारे...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

उद्धव ठाकरेंचं दिवंगत अनंत तरे यांच्याबाबत मोठं वक्तव्य

उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका
Uddhav Thackeray on Anant Tare , Thane : "हाच आपल्याला दगा देईल, असं अनंत तरेंनी आधीच सांगितलं होतं. मात्र, अनंत तरेंचं तेव्हा ऐकलं नाही, याचा पश्चाताप होतोय", असं म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली. ठाण्यामध्ये शनिवारी (दि.11) योगेश कोळी लिखित अनंत आकाश अर्थात आठवणीतील अनंत तरे या पुस्तकाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाश झालं. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
हेही वाचा : Pune: कोथरूडच्या गुन्हेगारीवर भाजपच्या दिग्गज नेते का धरतायेत मौन?
उद्धव ठाकरे म्हणाले, आज अनंत तरेंची आठवण येतेय. मला वहिनी म्हणाल्या की ते असते तर त्यांना किती आनंद झाला असता. मी म्हणालो ते असते तर आपल्याला किती आनंद झाला असता. प्रामाणिकपणे अनेकजण गोष्टी सांगत असतात. पण निष्ठेचे मुखवटे घालून बसलेली माणसं आपल्या आजबाजूला इतका वेढा घालून बसतात की नाही म्हटलं तरीही आपल्या लोकांकडे दुर्लक्ष होतं. आता मला नाही म्हटलं तरी पश्चात्ताप होत आहे. तेव्हाच मी अनंत तरेंचं ऐकलं असतं तर आत्ता जरा कुठे गळ्याशी येतं म्हटल्यावर अमित शाह यांच्या चरणी लोटांगण घालून वाचवा वाचवा म्हणत हंबरडा फोडत बसणारी माणसं दिसली नसती.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, 2014 साली अनंत तरे निवडणूक लढवणार होते. त्याचवेळी भाजपाने अचानक युती तोडली आणि विधानसभा निवडणुकीची वेळ आली. त्या काळातच शिवसेना संपवण्याचा डाव आखला गेला होता. आपण ठामपणे उभे राहिलो, आपल्या उमेदवारांना उभे केले. त्या वेळी अनंत तरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. अनेकांनी मला सांगितले की तरे ऐकून घेत नाहीत. तेव्हा लोटांगणवीर माझ्याकडे आले आणि म्हणाले, काहीतरी करा नाहीतर ती जागा हातातून जाईल. मग मी स्वतः तरे यांच्याशी चर्चा करून त्यांना समजावले. आपण भाजपाचे संकट दूर करु, कारण ते आपल्याला संपवण्याच्या तयारीत आहेत, नंतर मानपानाचा विचार करू, असं मी सांगितलं. त्यावर अनंत तरे यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की, “हाच माणूस एक दिवस आपल्याला दगा देईल.” आणि आज नेमकं तेच घडलं. अनंत तरे नावाचा तो राजहंस आज आपल्यात असता, तर हे कावळे इतके फडफडले नसते, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.