सियाची काळी कृत्यं केतनच्या काकूने सांगितली...काय करायती ती?
केतन अग्रवाल या तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ कॅन्डल लाईट मार्च काढण्यात आला होता. शनिवारी संध्याकाळी पुण्यात अग्रवाल कुटुंबातर्फे आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने हा भव्य मार्च काढण्यात आला. यावेळी केतनच्या काकू काय म्हणाल्या?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सियाची काळी कृत्यं केतनच्या काकूने सांगितली
काय करायती ती?
Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल या तरुणाच्या पूर्वनियोजित आणि निर्घृण हत्येच्या निषेधार्थ त्याचे नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनी एकत्र येत कँडल मार्च काढला. केतनला न्याय मिळावा आणि या हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी सर्वजण रस्त्यावर उतरले आहेत. केतनची होणारी पत्नी सिया आणि तिचा प्रियकर चेतन यांनी संगनमत करून हे हत्याकांड घडवून आणल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे अग्रवाल आणि गोयल कुटुंबाला मोठा धक्का बसला असून, सियाने केलेल्या या क्रूर कृत्यामुळे समाजातूनही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सर्वांनाच मानसिक धक्का
या कँडल मार्चदरम्यान केतनच्या काकूंनी आणि इतर नातेवाईकांनी सियाच्या धक्कादायक वर्तनावर तीव्र संताप व्यक्त केला. सियाला ते ती 10 वर्षांची असल्यापासून ओळखत होते. सिया नेहमीच सर्वांशी अत्यंत प्रेमाने वागायची, लहान मुलांसाठी केक बनवून आणायची आणि तिने स्वतःची एक अत्यंत 'चांगली मुलगी' असल्याची खोटी प्रतिमा कुटुंबासमोर उभी केली होती. तिच्या मनात केतनविषयी इतके विष असेल याची पुसटशीही कल्पना कुटुंबाला कधीच आली नाही. सियाने कुटुंबाचा विश्वासघात केल्यामुळे तिच्या या खोट्या चेहऱ्यामागचे सत्य समोर आल्यावर सर्वांनाच मोठा मानसिक धक्का बसला आहे.
हे ही वाचा : व्यावसायिकाची पत्नी गोगी गँगला मिळाली, पतीच्या हत्येचा कट अन् मागितली 50 लाखांची खंडणी
'तिने एकदा स्पष्ट सांगायला हवे होते'
सियाने हत्येचे समर्थन करण्यासाठी केतनचे केस गळणे किंवा त्याचे तोतरे बोलणे अशी जी कारणे दिली आहेत, ती अत्यंत मूर्खपणाची आणि खोटी असल्याचे नातेवाईकांनी स्पष्ट केले. लग्न ठरण्यापूर्वीच या सर्व गोष्टी दोन्ही कुटुंबांमध्ये स्पष्ट झाल्या होत्या. केतन अत्यंत मनमिळाऊ आणि निष्पाप तरुण होता. सियाला जर हे लग्न मान्य नव्हते, तर तिने एकदा स्पष्ट सांगायला हवे होते, केतनने स्वतःहून तिला आनंदाने सोडून दिले असते, अशी भावना कुटुंबाने व्यक्त केली. मुलांची लग्ने ठरवताना त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवू देणे आणि त्यांच्या इच्छेचा आदर करणे आवश्यक असते, असा सल्लाही नातेवाईकांनी दिला असून, सियाच्या खोटारडेपणाचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
हे ही वाचा : नागपूर : कानाखाली मारल्याचा राग, भावाला बोलावले अन् तलवारीने...
फाशीच्या शिक्षेची मागणी
सुरुवातीला या हत्येमागे सियाचा हात असेल यावर कुटुंबाचा अजिबात विश्वास बसत नव्हता. मात्र, जसे ठोस पुरावे समोर आले, तसे कुटुंबाचे सियावरील प्रेम संपून त्याचे रूपांतर आता कमालीच्या द्वेषामध्ये झाले आहे. केतनला न्याय मिळवून देण्यासाठी सिया आणि तिचा प्रियकर चेतन या दोघांनाही फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी ठाम मागणी कुटुंबाने केली आहे. ज्या निर्दयीपणे त्यांनी केतनला कड्यावरून खाली ढकलून दिले, त्याच कड्यावरून या दोघांनाही खाली फेकून द्यायला हवे, जेणेकरून विश्वासघात झाल्यावर आणि जीव जाताना किती भयानक वेदना होतात, याची जाणीव या गुन्हेगारांना होईल, अशा संतप्त आणि उद्विग्न भावना नातेवाईकांनी व्यक्त केल्या आहेत.









