मुलीचं नाव, घराचं नाव 'काशी', गुप्त काशीला जातानाच हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये यवतमाळच्या तिघांचा अंत
केदारनाथहून गुप्तकाशीकडे जात असलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये एका पायलटसह एकूण सहा प्रवासी होते. दोन वर्षांच्या चिमुकलीचाही यात समावेश होता.
ADVERTISEMENT

यवतमाळ : वणीतील प्रसिद्ध कोळसा व्यापारी, वाहतूकदार आणि शिवभक्त राजकुमार जायस्वाल यांचे त्यांच्या पत्नी श्रद्धा आणि मुलीसह केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात दुःखद निधन झालं. या घटनेने संपूर्ण वणी परिसरात शोककळा पसरली आहे.
हे ही वाचा >> हॉटेल भाग्यश्री बंद म्हणून पुन्हा तोडफोड; दोन तरूणांना पकडलं, नागेश मडके म्हणाले...
राजकुमार जायस्वाल हे वणीतील वारोरा बायपासजवळील कार्यालयातून आपला कोळसा आणि वाहतूक व्यवसाय सांभाळत होते. वयाच्या कमी वयातच त्यांनी व्यवसायात स्वतःचे नाव कमावले होते. ते प्रचंड शिवभक्त म्हणून परिचित होते आणि त्यांनी वणी येथे प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कार्यक्रमाचे आयोजन करून मोठा योगदान दिले होते. त्यांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी श्रद्धाशी दुसरं लग्न केले होते.
मुलीचं नाव काशी, घराचं नाव काशी...
राजकुमार यांच्या मुलीचं नाव काशी असं होतं. तसंच त्यांच्या घराचं नावही काशी असंच ठेवलं होतं. आज राजकुमार, पत्नी श्रद्धा आणि मुलगी काशी हे तिघेही गुप्त काशीला जाण्यासाठी केदारनाथमधून हेलिकॉप्टरने निघाले होते. मात्र, मध्येच त्यांच्यावर काळाने घाला घातला.
अपघात कसा घडला?
सकाळी 5.20 च्या सुमारास आर्यन एव्हिएशन कंपनीचं हे हेलिकॉप्टर गौरीकुंडजवळ कोसळलं. केदरनाथवरुन हेलिकॉप्टरने टेक ऑफ केलं, केदारनाथहून गुप्तकाशीकडे जात असलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये एका पायलटसह एकूण सहा प्रवासी होते. दोन वर्षांच्या चिमुकलीचाही यात समावेश होता. गौरीकुंड आणि त्रीजुगीनारायण दरम्यान हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं आणि पायलटसह सगळ्याच प्रवाशाांचा मृत्यू झाला.
खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतीये. केदारघाटांमध्ये सोसाट्याचे वारे आणि तिथल्या खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर रस्ता चुकलं, हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला यानेंतर गैरीकुंडच्या जंगलामध्ये हे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची बातमी समोर आली. हेलिकॉप्टकमध्ये महाराष्ट्र, उत्तराखंड, उत्तरप्रदेशमधील प्रवासी होते.
हे ही वाचा >> केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश, 7 जणांचा मृत्यू, मृतांपैकी 3 जण महाराष्ट्रातील यवतमाळचे
राजकुमार यांच्या पश्चात त्यांचे दोन मुले आणि आई असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात निधनामुळे वणीमध्ये मोठी शोककळा पसरली आहे.