Rajasthan Elections 2023 : गेहलोतांच्या भूमीत मोदींची ‘जादू’, भाजपने कसा बदलला ‘गेम’?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

How BJP changed the game in Rajasthan assembly election 2023
How BJP changed the game in Rajasthan assembly election 2023
social share
google news

राजस्थानमध्ये पुन्हा एकदा राजकीय परंपरा पाळली गेली. इथे 1993 पासून एक राजकीय पायंडा सुरू आहे. इथे दर पाच वर्षांनी सरकार बदलते, ही प्रथा यावेळीही कायम राहिली. कल बदलेल आणि गेहलोत यांची जादू चालेल, अशी काँग्रेसला आशा होती. पण ना गेहलोतांची जादू चालली ना रीत बदलली. काँग्रेसची काँग्रेसची राजवट मात्र बदलली गेली. मतमोजणीपूर्वी विजयाचा दावा करणाऱ्या काँग्रेसच्या खात्यात केवळ 69 जागा आल्या आहेत, तर 115 जागा जिंकत राजस्थानाच्या वाळवंटात कमळ फुलले.

राजस्थानमध्ये भाजप विजयाचा आनंद साजरा करत असताना काँग्रेस पराभवाची कारणे शोधत आहे. निवडणूक जिंकल्यानंतर वसुंधरा राजे यांनी विजयाचे श्रेय पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि जेपी नड्डा यांना दिले. दुसरीकडे अशोक गेहलोत म्हणाले की, राजस्थानच्या जनतेने दिलेला जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो. हा निकाल प्रत्येकासाठी अनपेक्षित आहे. आमच्या योजना, कायदे आणि नवकल्पना लोकांपर्यंत नेण्यात आम्ही पूर्णपणे यशस्वी झालो नाही, हे या पराभवावरून दिसून येते.”

हेही वाचा >> तीन राज्यातील पराभवानंतर ठाकरेंनी काँग्रेसची केली कानउघाडणी

राजस्थानमधील विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आता राजस्थानची कमान कोणाच्या हाती द्यायची यावर विचारमंथन सुरू झाले आहे. पण 5 मोठी कारणे आहेत, ज्यामुळे राजस्थानमध्ये भाजपने विजयाचा गुलाल उधळला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

1) PM मोदींची जादू कायम

राजस्थानमधील भाजपच्या विजयाचं पहिलं कारण म्हणजे पंतप्रधान मोदींनी निवडणुकीच्या वर्षात राजस्थानचे अनेक दौरे केले. राजस्थानच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या सभा झाल्या. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी प्रचंड रोड शो केले. यावेळी त्यांनी गेहलोत सरकारवर वारंवार निशाणा साधला. राजस्थानमधील महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांकडे मतदारांचे लक्ष वेधले. यासोबतच राजेंद्र गुडा यांच्या लाल डायरीचा मुद्दाही जोर देऊन मांडण्यात आला. पीएम मोदींच्या मेहनतीचे रूपांतर यशात झाले.

2) भाजपने खेळले हिंदुत्वाचे कार्ड

राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपने उदयपूरमधील कन्हैयालाल हत्या प्रकरणाचा मुद्दा जोरदारपणे उचलून धरला होता. 2022 मध्ये उदयपूरमधील कन्हैयालाल हत्येची घटना पंतप्रधान मोदी वारंवार मांडत होते, तसेच भाजपचे सर्व नेते ‘दुहीकरणाच्या राजकारणा’साठी काँग्रेसवर वारंवार हल्ला करत होती. बाबा बालकनाथ यांना उमेदवार करून आणि अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीचा उल्लेख करून भाजपने हिंदुत्वाचे कार्ड खेळले. ज्याचा प्रभाव राजस्थानच्या मतदारांवर पडला. त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालात स्पष्ट दिसत आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> तीन राज्यातील विजयानंतर PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले ‘देशविरोधी…’

3) महिला सुरक्षेच्या बाबतीत काँग्रेस अपयशी

राजस्थानमध्ये गेल्या काही वर्षांत बलात्कार आणि महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. हे मतदारांच्या मनावर बिंबवण्यात भाजपला यश आले. महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून भाजप सातत्याने काँग्रेसला कोंडीत पकडत होती. मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न परेड केल्याचं प्रकरण समोर आल्यावर गेहलोत यांनी या मुद्द्यावरून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, पण भाजपनं यावर चोख प्रत्युत्तर दिलं. गेहलोत सरकारच्या कार्यकाळात राजस्थानमध्ये वाढलेल्या गुन्हेगारीवर प्रदेश भाजपने सातत्याने हल्ला चढवला.

ADVERTISEMENT

4) गेहलोत-पायलट मतभेदाचा भाजपला झाला फायदा

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या कल्याणकारी योजनांमुळे त्यांच्या सरकारविरोधातील सत्ताविरोधी लाट कमी झाली असेल, परंतु काँग्रेसच्या विद्यमान आमदारांविरोधात मतदारांमध्ये रोष आहे. राजकीय जाणकारांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसने अनेक आमदारांच्या उणिवा आणि नकारात्मक प्रतिमा असतानाही त्यांची तिकिटे रद्द केली नाहीत. त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर झाला. याशिवाय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही अशोक गेहलोत-पायलट यांचा मुद्दा उपस्थित केला. त्याचा परिणाम निवडणुकीवरही दिसून आला.

हेही वाचा >> निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अभिनेत्रीचा निकाल काय?

गेहलोत-पायलट यांच्यातील वादामुळे राज्याचा विकास ठप्प झाल्याचा दावा भाजप नेत्यांनी वारंवार केला. इतकंच नाही तर निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर घराणेशाहीचं राजकारण केल्याचा आरोप करत या पक्षात जो नेता सत्य बोलतो, त्याचं राजकारण खड्ड्यात जातं, असं म्हटलं होतं. काँग्रेस पक्ष राजेश पायलट यांच्यावरील राग त्यांचा मुलगा सचिन पायलट यांच्यावर व्यक्त करत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता. मात्र, गुर्जर मतांना वेसण घालण्याचा डाव म्हणून काँग्रेसने ते नाकारले. पण गेहलोत आणि पायलट यांच्यातील फूट जमिनीवर दिसत होती, जी काँग्रेसच्या विजयात मोठा अडथळा ठरली.

5) पेपर फुटणे आणि भ्रष्टाचार हे बनले मोठे मुद्दे

राजस्थानमधील निवडणूक प्रचारात भ्रष्टाचार आणि पेपरफुटीच्या मुद्द्यांचा बोलबाला होता. पेपरफुटीवरून भाजपने सत्ताधारी पक्ष काँग्रेसला सातत्याने गोत्यात उभे केले. 2022 च्या पेपर लीक प्रकरणी ऑक्टोबर महिन्यात अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेस नेते गोविंद सिंग दोतासरा यांच्या घरावर छापा टाकला होता. ज्याने विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात राजकीय पेच निर्माण केला होता.

हेही वाचा >> “भाजपला अनुकूल…”, निवडणूक निकालांचा शरद पवारांनी सांगितला अर्थ

राजस्थान शिक्षक पात्रता चाचणी पेपर लीक प्रकरणी गोविंद सिंग दोतासराची मुले अभिलाष आणि अविनाश यांनाही समन्स बजावण्यात आले होते. भाजपने या मुद्द्याला आपले हत्यार बनवले. यासोबतच खुद्द पीएम मोदींनी राजेंद्र गुडाच्या लाल डायरीचा मुद्दा अनेकदा उपस्थित केला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT