‘शिंदे-फडणवीस गुलाबी मेकअप करून…’, ‘सुप्रीम’ निकालानंतर सामनात काय?
supreme court verdict on maharashtra political crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल 11 मे रोजी आला. पाच सदस्यीय घटनापीठाने बेकायदेशीर बाबींवर बोट ठेवत उद्धव ठाकरेंनी स्वमर्जीने राजीनामा दिला असल्यामुळे मुख्यमंत्री करू शकत नाही, असं सांगितलं. या सगळ्या निकालावर सामना अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT

‘जेव्हा अंतःकरण भरून येते तेव्हा आपल्या मनातील भावना आणि कल्पना व्यक्त करावयास शब्द अपुरे पडतात’, असं म्हणत शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचं स्वागत केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकालात नोंदवलेल्या मुद्द्यांवर बोट ठेवत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सामना अग्रलेखातून भाष्य केलं आहे.
सामना अग्रलेखात म्हटलं आहे की, “महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या बाबतीत जो निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने दिला त्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. सरन्यायाधीश चंद्रचूड हे रामशास्त्री बाण्यानेच वागले व बेडरपणे त्यांनी जे निकालपत्र वाचन केले त्यातून एक स्पष्ट झाले ते म्हणजे, ‘राजकारण, सत्ताकारण, घटनात्मक संस्था मारल्या असतील, पण न्याय मेलेला नाही!’ महाराष्ट्रातील शिंदे सरकार बनवताना संसदीय संकेत, सरकारी यंत्रणा, राज्यपाल, घटनात्मक तरतुदी असे सर्व काही पायदळी तुडवले गेले.”
सुनील प्रभू हेच खरे प्रतोद…
शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुढे म्हटलं आहे की, “आता सर्वोच्च न्यायालयाने परखडपणे सांगितले की, ‘उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा स्वखुशीने दिला. त्यांनी राजीनामा दिला नसता तर मुख्यमंत्रीपदावर त्यांची पुनर्स्थापना करणे शक्य झाले असते.’ हे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. याचाच अर्थ आजचे मुख्यमंत्री व त्यांचे सरकार बेकायदेशीर ठरवले. कोणत्याही फुटीर गटाला मूळ पक्षावर दावा सांगता येणार नाही हे महत्त्वाचे. फुटीर गटाने नियुक्त केलेले प्रतोद भरत गोगावले बेकायदेशीर आहेत. शिवसेनेचे सुनील प्रभू हेच खरे प्रतोद असल्याचा निर्वाळा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला.”
गुलाबी मेकअप… शिंदे-फडणवीसांवर टीकास्त्र
“तत्कालीन राज्यपालांची भूमिका संशयास्पद आहे. जे करू नये ते त्यांनी केले. नवे सरकार बनवू देताना त्यांनी केलेली कृतीही सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवली. सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले. म्हणजे राज्यपालांनी विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी बहुमताच्या चाचणीस मान्यता देणे हेच चूक ठरले व त्यातून निर्माण झालेल्या बेकायदेशीर सरकारला शपथ देणे घटनाबाह्य ठरते. आज महाराष्ट्रातले सरकार पूर्णपणे ‘अपात्र’, घटनाबाह्य ठरले तरी शिंदे-फडणवीस चेहऱ्यावर गुलाबी मेकअप करून सांगत आहेत, ‘आम्हीच जिंकलो!’, अशी टीका अग्रलेखातून शिंदे-फडणवीस यांच्यावर केली आहे.