RPF Constable : “मनोरुग्ण निवडून माणसं मारतो का?”, जितेंद्र आव्हाडांचा चढला पारा
जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ जवान चेतन सिंह याने गोळीबार केला. यात चार जणांचा मृत्यू झाला. याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत.
ADVERTISEMENT

RPF Constable Chetan : 31 जुलै रोजी मुंबईकडे येत असलेल्या जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये भयंकर हत्याकांड घडलं. रेल्वे दलाच्या जवानाने एका वरिष्ठ सहकाऱ्यासह तीन जणांची गोळ्या घालून हत्या केली. अंदाधूंद गोळीबार करणारा चेतन सिंह हा मानसिक रुग्ण असल्याचे रेल्वे पोलीस दलाकडून सांगण्यात आले. पण, यावरूनच जितेंद्र आव्हाडांचा पारा चढला. आमदार आव्हाडांनी काही प्रश्न या घटनेवरून उपस्थित केले असून, याची उत्तरं कोण देणार? असा सवाल आव्हाडांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून, या घटनेबद्दल काही शंका उपस्थित केल्या आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड म्हणतात, “चेतन सिंह ह्याने जो काल गोळीबार केला; त्यामध्ये आचार्य नावाच्या त्याच्या सहकार्याने दिलेल्या जबाबामध्ये त्याने टिकाराम यांच्याशी वादविवाद केल्याचे सांगितले. हे सगळं जवळ-जवळ अर्धा तास चालू होतं.”
वाचा >> Firing: ‘ये सब PAK से ऑपरेट हैं…’, जयपूर-मुंबई ट्रेनमधील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
“त्याची मानसिक स्थिती बरोबर नाही, असं पोलिसांनी न्यायालयामध्ये सांगितलं. हे कशावरुन पोलिसांनी शोधून काढलं. जर त्याची मानसिक स्थिती बरोबर नाही हे जर माहिती होत, तर त्याला कामावर का ठेवलं?”, असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.
जयपूर-मुंबई एक्स्प्रेस गोळीबार : “हा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न”
“प्रकरण दाबण्याचा हा प्रयत्न आहे. एखादा व्यक्ती मानसिक रुग्ण आहे; तर त्याच्या हातात रायफल दिली जाते का? मानसिक रुग्ण हा वादविवाद घालू शकतो का? आणि मानसिक रुग्ण वेगवेगळ्या कम्पार्टमेंटमध्ये जाऊन निवडून माणसं मारतो का ? याची उत्तर कोण देणार”, अशी प्रश्नांची सरबत्तीच जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.