आईच्या निधनानंतर वडिलांनी केले दुसरे लग्न, मुलाने मित्रासोबत कट रचला अन् सगळंच संपवलं
एका मुलाने आपल्याच मित्राच्या मदतीने वडिलांची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. नात्याला काळिमा फासणारी ही घटना आहे अलीगडमधील. नेमकं काय घडलं जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आईच्या निधनानंतर वडिलांनी केले दुसरे लग्न
मुलाने मित्रासोबत कट रचला अन् सगळंच संपवलं
Crime News : उत्तर प्रदेशातील अलिगढमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका मुलाने आपल्याच मित्राच्या मदतीने वडिलांची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या पूर्णपणे पूर्वनियोजित होती. आरोपी मुलाने आधी वडिलांना भेटण्याच्या बहाण्याने बोलावले आणि नंतर मित्रासह त्यांना एका निर्जन स्थळी नेऊन त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. गंभीर दुखापतींमुळे वडिलांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
मित्रासोबत मिळून रचला कट
मिळालेल्या माहितीनुसार, बादशाह अली असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तपासादरम्यान समोर आले आहे की, त्यांचा मुलगा रिहान याने त्याचा मित्र समीर याच्यासोबत मिळून या हत्येचा कट रचला होता. योजनेनुसार बादशाह अली यांना बोलावून निर्जन ठिकाणी नेण्यात आले आणि त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते, परंतु पोलिसांनी घटनास्थळावरून मिळालेले पुरावे, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे दोघांचीही ओळख पटवून त्यांना अटक केली आहे. चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला चाकू आणि इतर महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत.
हे ही वाचा : वडील फुटपाथवर बॅग विकतात, मुलाचं NEET परीक्षेत यश; ओमची ह्रदयस्पर्शी कहाणी
आईच्या निधनानंतर दुसरे लग्न
या संपूर्ण हत्याकांडामागे दुसरे लग्न आणि मालमत्तेचा वाद हे मुख्य कारण असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आरोपी रिहानने पोलिसांना सांगितले की, त्याचे वडील बादशाह अली हे त्याच्या आईला त्रास देत असत. आईच्या निधनानंतर वडिलांनी दुसरे लग्न केले, ज्यामुळे कुटुंबात सातत्याने तणाव वाढत गेला. रिहान ज्या घराला आपल्या आईची शेवटची आठवण मानत होता, ते घर त्याचे वडील त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर करू इच्छित होते. याच रागातून आणि मालमत्तेच्या वादामुळे रिहानच्या मनात वडिलांबद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आणि त्याने आपल्या मित्रासोबत मिळून वडिलांचा काटा काढण्याचा कट रचला.
हे ही वाचा : पैसा-पाणी: AI Slop म्हणजे काय? त्यापासून थोडं सावधच राहा!
दोन्ही आरोपी ताब्यात
सध्या पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून या घटनेमागे आणखी काही कारण आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. अटक करण्यात आलेल्या रिहान आणि समीर या दोघांची कसून चौकशी केली जात आहे. न्यायालयात आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे सादर करता यावेत यासाठी फॉरेन्सिक तपास यंत्रणेचीही मदत घेतली जात आहे. नात्यांमधील विश्वासाला तडा देणाऱ्या या गुन्ह्यामध्ये सर्व तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून आरोपींविरोधात लवकरात लवकर मजबूत आरोपपत्र (चार्जशीट) दाखल केले जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.










