पैसा-पाणी: AI च्या बाबतीत भारत मागे पडतोय का?
Artificial intelligence ची सध्या सगळीकडे चर्चा आहे. मात्र, या महत्त्वाचा क्षेत्रात भारत मागे पडत असल्याचं चित्र तयार झालं आहे. याचबाबत पैसा-पाणी या विशेष सदरातून जाणून घेऊया सविस्तर.
ADVERTISEMENT

पहिली बातमी, Artificial intelligence (AI)चिप बनवणारी कंपनी Nvidia या कंपनीचे बाजार भांडवल (market cap) भारतीय बाजारात लिस्ट असलेल्या सर्व कंपन्यांच्या बाजार भांडवलापेक्षा जास्त झाले आहे. एक अमेरिकन कंपनीने आपल्या पाच हजार कंपन्यांवर भारी पडली आहे.
दुसरी बातमी, परदेशी गुंतवणूकदारांनी (FIIs) या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत भारतीय बाजारात जवळपास 2 लाख कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. हे मागील संपूर्ण वर्षापेक्षा जास्त आहे.
या दोन्ही बातम्यांची उत्तरं मिळाली ती प्रसिद्ध लेखक रुचिर शर्मा यांच्या मुलाखतीमधून. त्यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, परदेशी गुंतवणूकदारांना असं वाटतं की, भारत एआय (AI) मध्ये मागे पडला आहे. गुंतवणूकदार सध्या एआय (AI) मध्ये गुंतवणूक करू पाहत आहेत, जिथे त्यांना भविष्यात नफा दिसतोय. भारतात गुंतवणूक करण्यासाठी एआय (AI) कंपन्याच नाहीत. हेच एक प्रमुख कारण आहे की, भारतीय शेअर बाजार दोन वर्षांपासून स्थिर आहे, तर याच काळात Nvidia कंपनीच्या शेअरची किंमत 5-6 पटीने वाढली आहे.
रुचिर शर्मा यांच्या आधी, ब्रोकरेज फर्म बर्नस्टाईनने (Bernstein) देखील AI मध्ये भारत मागे पडण्याबद्दल भाष्य केले होते. त्यांच्या मते, भारत हा केवळ AI चा यूजर बनून राहील असा धोका आहे. अमेरिकेसारखे देश AI मॉडेल्स विकसित करत आहेत. जर आपण त्यांचा फक्त वापर करत राहिलो, तर अमेरिकन कंपन्या पैसे कमावतील.









