Mumbai News : विनातिकीट प्रवाशांना दणका! मध्य रेल्वेनं कोणतं पाऊल उचललं?
नुकत्याच संपलेल्या मे 2026 या एकाच महिन्यात रेल्वेने तब्बल 2 लाख विनातिकीट प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 140 टक्क्यांनी महसूलात वाढ झाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
Mumbai News : विनातिकीट प्रवाशांना दणका!
मध्य रेल्वेनं कोणतं पाऊल उचललं?
Mumbai News : रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात जोरदार मोहीम उघडली असून, नुकत्याच संपलेल्या मे 2026 या एकाच महिन्यात तब्बल 2 लाख विनातिकीट प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने या कारवाईतून 13 कोटी 94 लाख रुपयांचा भरघोस महसूल दंडाच्या माध्यमातून वसूल केला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता, तपासणी पथकांनी ही धडक मोहीम राबवली होती.
गेल्या वर्षाच्या तुलनेत 140 टक्क्यांनी वाढ
गेल्या वर्षीच्या म्हणजेच मे 2025 च्या तुलनेत यंदाच्या कारवाईत आणि दंडाच्या रकमेत प्रचंड मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मे 2025 मध्ये रेल्वेने 1 लाख 27 हजार विनातिकीट प्रवाशांना पकडले होते आणि त्यांच्याकडून 5 कोटी 81 लाख रुपयांचा दंड वसूल केला होता. या तुलनेत यंदा गोळा झालेल्या दंडाच्या रकमेत तब्बल 140 टक्क्यांची वाढ झाली असून, विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय वाढल्याचे समोर आले आहे.
हे ही वाचा : महाराष्ट्र आता थांबणार नाही! मंत्रिमंडळ बैठकीतील तीन धडाकेबाज निर्णय
प्रशासनाकडून तपासणी मोहीम तीव्र
रेल्वेचे अधिकृत तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रामाणिक प्रवाशांना विनातिकीट प्रवाशांमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. हा त्रास थांबवण्यासाठी आणि रेल्वेचा महसूल बुडवणाऱ्यांना चाप लावण्यासाठी प्रशासनाने ठिकठिकाणी सरप्राईज चेकिंग आणि तिकीट तपासणी मोहीम तीव्र केली आहे. रेल्वे स्थानकांवर आणि धावत्या गाड्यांमध्येही ही तपासणी कठोरपणे केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे ही वाचा : Exclusive: 'निष्ठा पराभूत झालेली नाही, निष्ठेची चेष्टा झाली..', NCP चे माजी आमदार कोणावर संतापले?
'सन्मानाने प्रवास करा'
या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने सर्व प्रवाशांना एक नम्र आवाहन केले आहे. "रेल्वेने प्रवास करताना नेहमी वैध तिकीट किंवा योग्य पास सोबत बाळगावा. विनातिकीट प्रवास करून दंडात्मक कारवाई आणि कायदेशीर अडचणींचा सामना करणे टाळावे. प्रवाशांनी नेहमी तिकीट काढून सन्मानाने आणि सुरक्षित प्रवास करावा," असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.









