Aaditya Thackeray: ठाकरे एकत्र येणार?, काकांचा विषय पुतण्याने उचलून धरला; म्हणाले टोलनाके…
आपली सत्ता आल्यानंतर मुंबईच्या एंट्री पॉईंटवरील दोन्ही टोलनाके आपण बंद करू असं विधान आदित्य ठाकरेंनी केलं आहे. पण यामुळे मनसे-शिवसेना (UBT) एकत्र येणार अशी चर्चा सुरु झाली आहे.
ADVERTISEMENT

MNS-Shiv Sena Toll: मुंबई: शिवसेना (UBT) पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आज (7 जुलै) मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेत एक मोठी घोषणा केली. आपली सत्ता आल्यानंतर मुंबईतील पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर टोल (Toll) तात्काळ बंद करण्यात येईल असं ते म्हणाले. तसेच आता सध्या या रस्त्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार दोनदा कर वसूल करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. मात्र, आदित्य ठाकरेंच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात मात्र एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येण्याची. (aaditya thackeray big statment on mumbai entry point toll discussions have started mns shiv sena ubt will come together)
टोल नाक्यांचा विषय हा सगळ्यात आधी मनसेने (MNS) हाती घेतला होता. राज ठाकरे यांनी या विषयावरून महाराष्ट्रात रान पेटवलं होतं. मात्र, कालांतराने हा विषय काहीसा मागे पडला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच पुन्हा एकदा टोल नाक्यांचा विषय मनसेने हाती घेतला. असं असताना आता याच विषयावरुन आदित्य ठाकरेंनाही घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
हे ही वाचा >> Maharashtra : ‘राज ठाकरेंना फोन करणार, पण…’, उद्धव ठाकरे खासगीत काय बोलले?
एकीकडे अजित पवार हे भाजपसोबत गेल्यापासून मनसे आणि शिवसेना (Shiv Sena UBT)हे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अशातच आता दोन्ही पक्ष एकमेकांना सुसंगत अशी भूमिका घेत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता काकांचा विषय पुतण्याने हाती घेतल्याने त्याचं राजकीय सूत जुळतंय का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘ते’ टोलनाके आम्ही बंद करू, आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?
गेल्या नोव्हेंबरमध्ये मुंबईतील पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग महापालिकेच्या ताब्यात देण्यात आले होते. या दोन्ही रस्त्यांची डागडुजी, रंगरंगोटी आदी कामे पालिकेने करायची आहेत. पालिकेच्या खर्चाने ही कामे केली जात आहेत. पालिका मुंबईकरांकडून कर वसूल करते. या कराच्या पैशातून या रस्त्याची दुरुस्ती व देखभाल केली जात आहे. या दोन प्रमुख रस्त्यांची देखभाल महापालिका करत असेल, तर टोल नाक्यांचा पैसा एमएसआरडीसीकडे का जात आहे? या रस्त्यावरील होर्डिंग्जचा पैसा एमएसआरडीसीकडे का जात आहे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.