'माझ्या भावाची शेवटची इच्छा, पण त्या विषयाला पूर्णविराम..' विलिनीकरणाबाबत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विलिनीकरणाबाबत प्रतिक्रिया दिली. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिल्याचं त्यांनी सांगितलं. दिल्लीत जंतर-मंतरवर सोनम वांगचूक यांची भेट घेण्यासाठी त्या गेल्या होत्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
माझ्या भावाची शेवटची इच्छा, पण त्या विषयाला पूर्णविराम..
विलिनीकरणाबाबत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
Supriya Sule : दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा सध्या सुरु आहे. विलीनीकरणाच्या चर्चेला आधी नकार देणाऱ्या सुनील तटकरेंनी युटर्न घेत दिवंगत अजित पवार हयात असताना या चर्चा झाल्याचं सुनील तटकरेंनी आता मान्य केलं आहे. याविषयी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिल्याचं त्यांनी सांगितलं. दिल्लीत जंतर-मंतरवर सोनम वांगचूक यांची भेट घेण्यासाठी त्या गेल्या होत्या. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विलीनीकरणाबाबत भाष्य केलं. त्या नेमकं काय म्हणाल्या जाणून घेऊया.
'त्या विषयाला पूर्णविराम'
सुनील तटकरेंनी विलिनीकरणाच्या चर्चेवर युटर्न घेतला. याविषयी बोलताना सुळे म्हणाल्या की, 'माझा भाऊ आज राहिला नाही. त्यामुळे माझ्या भावाबद्दल, झालेल्या चर्चेबद्दल त्याला आता पूर्णविराम मिळालेला आहे. माझा भाऊ जाऊन पाच महिने झाले. आता आम्ही एक कुटुंब म्हणून सावरतोय. माझ्या भावाची शेवटची इच्छा होती की दोन्ही पक्ष (राष्ट्रवादी) एकत्र येऊन गुण्या-गोविंदाने राज्याची आणि सगळ्या देशाची सेवा करावी. भावाची ही इच्छा पूर्ण करण्याची तयारी माझी दादा असतानाही होती आणि दादा गेल्यावरही होती. पण आता काय तशी भावना त्या बाजूने येत नाहीये. त्यामुळे माझ्या मनात आणि आमच्या संघटनेत त्या विषयाला पूर्णविराम दिला.'
हे ही वाचा : "डर्टी संजय राऊत, संघभूमीवर नाक रगडून..", नितेश राणेंनी थेट पत्र लिहिलं, नेमकं काय घडलं?
'आम्ही स्वाभिमानी आहोत'
पुढं बोलताना त्यांनी सांगितलं की, 'जेव्हा आमच्यातील नेते गेले आणि समोरच्याने सांगितलं की अशी घटना झालीच नाही, तेव्हा आम्हाला प्रचंड दु:ख झालं आणि वेदना झाल्या. एकतर माझा भाऊ गेला होता आणि माझ्या भावाची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आमचे सगळे प्रयत्न होते. कारण तो प्रस्ताव माझ्या भावाचा होता. त्यामुळे आमच्याकडून तो विषय आम्ही त्यादिवशीच संपवला. आम्ही स्वाभिमानी लोक आहोत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, ज्यादिवशी माझा भाऊ गेला आणि समोरच्यांच्या स्टेटमेंटवरुन माझ्या लक्षात आलं की दादांची इच्छा पूर्ण करण्यात रस नाही. तेव्हा मी पूर्णविराम दिला आणि त्यानंतर आम्ही राज्याच्या आणि देशाच्या सेवेला लागलो आहोत.'
हे ही वाचा : मुंबईची खबर : 'बेस्ट'ची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला, बीएमसीच्या महासभेत काय घडलं?
'सोनमजींचा लढा आम्ही लढू'
सोनम वांगचूक यांच्या भेटीविषयी त्यांनी सांगितलं की, ' सोनमजींना मी विनंती केली की त्यांनी उपोषण सोडावं. फार जास्त दिवस झाले आहेत. आणि सोनमजींचा हा लढा इथून पुढे आम्ही सगळे लढू. त्यांनी उपोषण सोडावं अशी विनम्र विनंती करायला आम्ही इथे आलो होतो.'










